एक तर तू राहशील नाहीतर मी राहील; उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा

मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उबाठा गटाला चांगले यश मिळून दिले. त्यानंतर आता शिवसेना उबाठा गटाकडून विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी आज मुंबईतील शाखाप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला संबोधित करत असताना उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली.
ठाकरे म्हणाले की, “अनिल देशमुखांनी सांगितले की मला व आदित्य ठाकरेंना आत टाकायचे डाव फडणवीस यांचे होते. सगळं सहन करुन मी हिंमतीने उभा राहिलो आहे. एक तर तू राहशील किंवा मी राहीन. आज माझ्याकडे चिन्ह, पैसा काहीच नाही. पण तुमच्या हिंमतीवर आव्हान देत आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
“लढाईला तोंड फुटत आहे. हर हर महादेव ही महत्वाची घोषणा आहे. लोकसभेत आणखी विजयाची अपेक्षा होती. अमोलही जिंकलाच आहे. अखिलेश, ममता बॅनर्जी यांची भेट झाली. अनेकजण बोलले की तुम्ही देशाला दिशा दाखवली. आम्ही असेच आहोत. वाकडे गेलात की तोडू. भाजपा म्हणजे चोर माणसं, राजकारणातील षंढ माणसं आहे. असा नडलो की मोदींना घाम फोडला. नरेंद्र मोदींचे भाषण बघताना आता किव येते. 10 वर्षं काय अंडी उबवली,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




