विधानसभा निवडणुकीत भाजपने किती जागा लढवाव्या?; नारायण राणे म्हणाले…

मुंबई : देशभरात काही दिवसांपूर्वी लोकसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसला. या पराभवानंतर राज्यात पुढच्या तीन महिन्यांनी विधानसभेची निवडणूक होणार आहे. या विधानसभेत किती जागांवर निवडणूक लढवावी, याबाबत महायुतीच्या तीनही पक्षांच्या नेत्यांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. असं असताना भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांचं हे वक्तव्य महायुतीमधील बरोबरीचे साथीदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं चिंता वाढवणारं आहे.
भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व 288 जागांवर निवडणूक लढवावी, असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं. “मला वाटतं की, भाजपने 288 जागा लढावाव्यात. पण मी माझं मत व्यक्त केलं आहे”, असं नारायण राणे म्हणाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी विधानसभेसाठी स्वबळाचा नारा दिला आहे. तसेच आपण 200 जागा लढवू, अशी घोषणा त्यांनी केली आहे. यावर नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली. “राज ठाकरे निवडणूक लढत आहे. ते बोलच आहेत की, 200 पेक्षा जास्त जागा असतील. ते त्यांचे हे जागांचे आकडे निवडणूक जाहीर होण्यापर्यंत सांगतील. पण नंतर सर्व बदल होईल. जागांचे आकडे वाढतील किंवा कमी होतील, नाहीतर अॅडजस्टमेंट होईल, बराच काही बदल होऊ शकतो”, असं नारायण राणे म्हणाले.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




