धक्कादायक! विजेचा शॉक लागून 3 कामगारांचा मृत्यू; डेक्कन परिसरातील घटना

पुणे : डेक्कन भागातील नदीपात्र परिसरात अंडाभुर्जी व्यावसायिकासोबत दोन कामगारांचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. मुसळधार पावसामुळे मुठा नदीत पाणी सोडल्यानंतर डेक्कन भागातील नदीपात्र परिसर पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे येथील व्यवसायिकांना त्यांचे गाडे, स्टॉल तसेच वाहने बाहेर काढण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. यादरम्यान, गुरूवारी अचानक पाणी सोडल्यानंतर काही अंडाभुर्जी व्यावसायिक त्यांचे स्टॉल बाहेर काढण्यास गेले होते. तेव्हा ही घटना घडली.
अभिषेक अजय घाणेकर (वय २५), आकाश विनायक माने (वय २१), व शिवा जिदबहादुर परिहार (वय १८, रा . डेक्कन) अशी मृत तरुणांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तिघेही नदीपात्र परिसरातील झेड पुलाखालील अंडा भुर्जीच्या गाडीवर काम करत होते. पुण्यात कालपासूनच जोरदार पाऊस आहे. त्यातच गुरुवारी पावसाने चांगलाच वेग धारण केला. त्यामुळे सर्वत्र पाणी साचले आहे. पहाटे तीन वाजताच्या सुमारास झेड पुलाखालील नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढला होता. अंडा भुर्जी गाडीवर काम करणारे तीन तरुण अंडा भुर्जी स्टॉल सुरक्षित ठिकाणी हलविण्याकरता गेले होते. तेव्हा त्यांना विजेचा शॉक लागला. त्यांना तात्काळ जवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांती डॉक्टरांनी पहाटे पाच वाजताच्या सुमारास मयत घोषित केले आहे.
घटनेची माहिती मिळताच डेक्कन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. डेक्कन पोलीस पुढील तपास करत आहेत. अभिषेक व आकाश विनायक माने हे पुलाच्या वाडी डेक्कन परिसरात राहत होते. तर, शिवा मुळचा नेपाळमधील असून, तो येथे स्टॉलवर काम करत होता.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




