तीन शाळकरी मुलांना विहिरीत ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न; पोलिसांनी एकाला ठोकल्या बेड्या

नाशिक : नाशिकमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तीन अल्पवयीन चिमुकल्यांना विहिरीत लोटून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील वडगावर पिंगळमधील घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शाळकरी मुलांच्या आई-वडिलांनी पोलिसांत धाव घेतली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सिन्नर तालुक्यातील पळसेजवळील वडगाव पिंगळमध्ये बुधवारी दि. 18 रोजी सायंकाळी 6 ते 6.30 च्या सुमारास आदित्य योगेश सानप, अथर्व संतोष घुगे तसंच वरद संतोष घुगे हे तिघं खेळत होते. यावेळी संशयित आरोपी अमोल लांडगे यानं त्यांना विहिरीजवळ जा आणि तिथं असणाऱ्या दोघांकडून कासव घेऊन या आणि मला द्या असं सांगितलं. तिन्ही मुलं कासव आणण्यासाठी विहिरीकडे गेली. विहिरीजवळ आल्यानंतर तिथं असलेल्या विक्रम माळी, साईनाथ ठमके आणि अमोल लांडगे या तिघा संशयितांनी मुलांना विहिरीत फेकलं आणि घटनास्थळावरून पळ काढला.
घटनेचं गांभीर्य ओळखून सिन्नर पोलिसांनी तपास करून संशयितांचा शोध घेत संशयित अमोल लांडगे याला बेड्या ठोकल्या. दोन फरार संशयितांचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या मुलांना मारण्यामागचा हेतू काय होता? याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र, जीव घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयितांना अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




