भाजपने दिलेली जबाबदारी किरीट सोमय्यांनी नाकारली; म्हणाले, ‘तीन वेळा हल्ले झाले तरीही…’

मुंबई: राज्यात आगामी काळात विधानसभा निवडणूक होणार आहे. राज्यात आपली सत्ता यावी यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी जोरदार तयारी करताना पाहायला मिळत आहे. दरम्यान महाविकास आघाडी आणि महायुतीतील सहभागी पक्ष देखील स्वतंत्रपणे किती जागा जिंकू शकतो किंवा कोणाला सत्ता मिळू शकते याचा अंतर्गत सर्व्हे करताना पाहायला मिळत आहे. तर लोकसभेत झालेला फटका टाळण्यासाठी भाजपने मेगा प्लॅन तयार केला आहे. माजी खासदार किरीट सोमय्यांवर मोठी जबाबदारी दिली आहे. किरीट सोमय्या यांची ‘विधानसभा निवडणूक संपर्कप्रमुख’पदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र किरीट सोमय्या यांनी पक्षाने दिलेली ही जबाबदारी नाकारली आहे.
विरोधी पक्षातील नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढून त्यांना सळो की पळो करून सोडणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दिलेली मोठी जबाबदारी नाकारली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार समितीच्या सदस्यपदी किरीट सोमय्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आपण २०१९ पासून पक्षाचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता असून ही जबाबदारी विनम्रपूर्वक नाकारत असल्याचे पत्र किरीट सोमय्या यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच रावसाहेब दानवे यांना लिहिलं आहे.
सोमय्या यांनी काय लिहिलंय पत्रात?
आपण विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूकप्रचार संपर्क प्रमुख म्हणून माझ्या नावाची मला न विचारता घोषणा केली, ही पद्धत चुकीची आहे,मला हे अमान्य आहे. आपण यासाठी अन्य कोणाची तरी नियुक्ती करावी, असं म्हणत सोमय्यांनी आपली नाराजी पत्रातून व्यक्त केली आहे.
त्यांनी म्हटले की, मला प्रचार समितीचा सदस्य म्हणून नियुक्त केल्याबद्दल आभार मानतो. या समितीत काम करण्यास मी असमर्थता व्यक्त करतो. गेली साडे पाच वर्षे, म्हणजे १८ फेब्रुवारी २०१९ पासून मी भाजपचा सामान्य सदस्य म्हणून काम करत आहे, मला सामान्य सदस्य म्हणून काम करू द्यावे.भाजपचा सामान्य सदस्य म्हणून ठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर काढले. त्यावेळी तीन वेळा माझ्यावर जीवघेणे हल्लेही झाले. मी आपल्या या निवडणूक व्यवस्थापन आणि प्रचार समितीमध्ये सामील होऊ शकत नाही. सामान्य सदस्य म्हणून आयुष्यभर पक्षाचे काम करणार.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




