लालपरीची चाकं थांबली, एसटी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर, काय आहेत मागण्या?

पुणे – ऐन गणेशोत्सवात राज्य परिवहन (एसटी) कर्मचारी संघटनेने बेमुदत संपाची हाक दिली आहे. एसटी कर्मचारी संघटना आजपासून राज्यभर बेमुदत आंदोलन करणार आहेत. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे, या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी संघटनेकडून सेवा बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच आर्थिक बाबी, खासगीकरण अशा विविध मागण्या विधानसभेची आचारसंहिता लागण्याआधी मान्य करा, असा इशाराही एसटी कर्मचारी संघटनेने दिला आहे. एसटी कामगाराने संयुक्त कृती समितीच्या वतीने प्रलंबित मागणी मान्य न झाल्याने हे आंदोलन केले जात आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने आर्थिक मुद्द्यांची सोडवणूक तातडीने व्हावी, यासाठी काल राज्यभरात तीव्र निदर्शन करण्यात आली. मुंबई सेंट्रल येथे कृती समितीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी सरकारला अंतिम इशारा देण्यात आला. यानंतर आजपासून एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील एसटींची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत होण्याची शक्यता आहे. तसेच एसटीच्या संपामुळे राज्यभरातील प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. ऐन गणेशोत्सवात एसटी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक देण्यात आल्याने चाकरमान्यांचेही हाल होणार आहेत.
एसटी कामगारांच्या मागण्या काय?
एसटी कामगारांच्या आर्थिक व महत्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्यामुळे कामगारांमध्ये निर्माण झालेली नाराजी विचारात घेऊन एस.टी. महामंडळातील बहुतांशी संघटनांची संयुक्त कृती समिती स्थापन केली. या समितीद्वारे राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्याबरोबरच मागील वेतन वाढीतील फरक दूर करणे, महागाई भत्त्याची थकबाकीची रक्कम देणे, मागील करारातील त्रुटी दूर करणे, याबरोबरच शिस्त व आवेदन पद्धतीमधील बदल, मेडिकल कॅशलेस योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू करणे या प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलन केले जात आहे.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




