अजित पवार युगेंद्र पवारांबद्दल बोलताना भावूक, नेमकं काय म्हणाले?

बारामती – राज्यात विधानसभा निवडणूकीचा बिगूल वाजला आहे. सर्व राजकीय नेत्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. सर्व उमेदवार आपापल्या मतदारसंघात प्रचारसभा घेत आङेत. अशातच आता बारामती विधानसभा मतदारसंघात जोरदार शक्तिप्रदर्शन करत राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर, त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे.
युगेंद्र पवार यांनी पक्षाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर अजित पवार यांनी बारामती येथे एक प्रचारसभा घेतली. या प्रचारसभेत युगेंद्र पवारांच्या उमेदवारीबद्दल बोलताना अजित पवार भावूक झाले होते. तसेच त्यांनी दोन वेळा आवंढा गिळला, भाषण थांबवून पाणी प्यायले. त्यानंतर त्यांनी आपलं भाषण चालू ठेवलं.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
“माझी मागे चूक झाली, पण आता कोणी चूक केली. पहिला फॉर्म मी भरणार होतो. आम्ही सगळे तात्यासाहेब पवारांचं कुटुंब. आमची बिकट परिस्थिती होती. आम्ही ती चांगली केली, आईने आधार दिला. आई सांगतीये, माझ्या दादाच्या विरोधात फॉर्म भरु नका. या पद्धतीन जे काही चाललं आहे ते बरोबर नाही. मोठ्या व्यक्तींनी यात मध्यस्थी करत बोलायला हवं होतं,” असं अजित पवार म्हणाले.
पुढे त्यांनी सांगितलं की, “फॉर्म कोणी भरायला सांगितला विचारलं तर म्हणतात साहेबांनी सांगितलं. म्हणजे मग साहेबांनी आमचं तात्यासाहेबांचं घऱ फोडलं का? आम्ही जिवाला जीव देणारी माणसं आहोत. इतक्या खालच्या पातळीवर राजकारण आणू नये. एकोपा राहायला पिढ्यानपिढ्या जातात. तुटायला वेळ लागत नाही”.
“आज मला तुम्हा सर्वांना सागंयच आहे की, आपल्याला आपला विकास करुन घ्यायचा आहे. घरातील भांडणं चार भिंतीच्या आत झाली पाहिजेत. चव्हाट्यावर आणण्याचं कारण नाही. दरी पडली तर ती साधायला दुसरं कोणी येऊ शकत नाही,” असंही अजित पवार म्हणाले.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




