बाणेर-बालेवाडीमधील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी जलदगतीने उपाययोजना करा; चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

पुणे – आगामी काळात सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर बाणेर- बालेवाडी- पाषाण- सुतारवाडी- सोमेश्वरवाडी भागातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी जलदगतीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश मंत्री पाटील यांनी दिले आहेत. तसेच, वाहतूक कोंडी होणाऱ्या भागात तातडीने वॉर्डन नेमावेत अशा सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या.

बाणेर- बालेवाडी- पाषाण- सुतारवाडी- सोमेश्वरवाडी भागातील नागरिकांसह चंद्रकांत पाटील यांची आज बाणेर-पाषाण रोडवरील ओकेजनल लॉन्स येथे बैठक झाली. या बैठकीला पुणे शहर वाहतूक शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपाआयुक्त अमोल झेंडे, चतु:शृंगीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक महेश बाळकोटगी, वाहतूक पोलीस निरीक्षक मिनल पाटील, पुणे महापालिका पथ विभागाचे दिलीप काळे यांच्यासह भाजप उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, भाजप नेते गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, लहू बालवडकर, प्रकाशतात्या बालवडकर,  उमाताई गाडगीळ, राहुल कोकाटे, स्वप्नाली सायकर, सुभाष भोळ, उत्तम जाधव, सचिन दळवी, मोरेश्वर बालवडकर, रोहन कोकाटे, अस्मिता करंदीकर यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला बाणेर- बालेवाडी- पाषाण- सुतारवाडी- सोमेश्वरवाडी भागातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठीच्या उपाययोजनांसदर्भात वाहतूक निरीक्षक मनोज पाटील यांनी सादरीकरण केले. यात प्रामुख्याने बाणेर मधील महाबळेश्वर हॉटेल चौकातील नदी पुलाच्या पुढील बाजूस १२० मीटर लांबीचा बॉटेल नेक उभारणे, बाणेरकडून बालेवाडीकडे जाताना १३० मीटरचा रस्ता बॉटल नेकने जोडणे, गणराज चौकातून राधा हॉटेलकडे जाणारा रस्ता बंद करणे, शिवाजी चौक ते सूस खिंड रस्त्यावर कॉसमॉस बॅंकेजवळ ३३० मीटरचा बॉटल नेक उभारणे, आवश्यक असल्याचे मनोज पाटील यांनी बैठकीत सांगितले.

Advertisement

त्यासोबतच मुरकुटे वस्ती येथील ७० मीटरची मिसिंग लिंक पूर्ण करणे, नेक्सा शोरुम जवळ अंडरपास तयार करणे, रेनॉल्ड शोरुम जवळ बॉक्स अंडरपास तयार करणे, ननावरे अंडर पासजवळ सेवा रस्त्याचे रुंदीकरण करणे आदी उपाययोजना सुचविल्या. त्यावर मंत्री पाटील यांनी वरील सर्व उपाय योजना या दीर्घकालीन आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव तयार करुन मंजुरीसाठी सादर करावा, अशा सूचना दिल्या. त्यावर पाठपुरावा करुन निर्णय घेऊ. मात्र, आगामी काळ हा सण- उत्सवांचा काळ आहे. त्यामुळे खरेदीसाठी नागरिक बाहेर पडतात. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होईल. याचा विचार करुन जलदगतीने उपाययोजना कराव्यात. जिथे सर्वाधिक वाहतूक कोंडीची आहे, त्या भागात वाहतूक पोलीस नेमावेत. तसेच, त्यांच्या सोबतीला वाहतूक नियमनासाठी सैन्य दल आणि पोलीस विभागातून निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. असे निर्देश दिले.

दरम्यान, बाणेरकडून विद्यापीठ मार्गे शहरात जाणाऱ्या रस्त्याच्या मार्गात बदल करुन वाहतूक कोंडीची समस्या सोडविल्या बद्दल नामदार चंद्रकांत पाटील आणि प्रशासनाचे आभार यावेळी उपस्थित नागरिकांनी मांडले. तसेच, महायुती सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या ७० टक्के मागण्या पूर्ण केल्या. त्याबद्दल फेसकॉम ज्येष्ठ नागरिक संघाकडून महायुती सरकारचे अभिनंदन या बैठकीत करण्यात आले.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page