उद्यापासून राज्यभर ‘जोडे मारो’ आंदोलन सुरु राहील; नाना पटोलेंची माहिती

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करुन भाजपा सरकारने महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोहचवली आहे. महाराज आपले दैवत आहेत, भाजपाने त्यांचा धडधडीत अपमान केला आहे, या अपमानाविरोधात जोडे मारो आंदोलन आयोजित केले असताना शिवद्रोही व्यवस्थेने विरोध केला, परवानगी नाकारली. आता काँग्रेसनेच महाराजांचा अवमान केल्याचा फेक नेरेटिव्ह देवेंद्र फडणवीस व भाजपा पसरवत आहे, फेक नॅरेटिव्ह पसरवणे हा भाजपाचा डिएनए आहे, असे प्रत्युत्तर देत आज मुंबईत जोडे मारो आंदोलन करण्यात आले असून उद्या २ तारखेपासून राज्यभर हे आंदोलन सुरु राहिल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
गांधी भवन येथे पत्रकारांशी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, ‘छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नाही तर संपूर्ण देशाचे गौरव आहेत’, असे पंडित जवाहरलाल नेहरु यांनी प्रतापगडावरील शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरणावेळीच जाहीरपणे सांगितले होते. आता पंडित नेहरुंच्या नावाने देवेंद्र फडणवीस अपप्रचार करत आहेत. फडणवीस यांनी नेहरुंचे पुस्तक संपूर्ण वाचलेले दिसत नाही, अर्धवट माहितीच्या आधारावर ते बोलत आहेत. खोटे बोल पण रेटून बोल अशी भाजपाची पध्दत आहे. पंडित नेहरु यांच्याबद्दलचा अपप्रचार फडणवीस यांनी थांबवावा. राजकोट किल्ल्यावरील महाराजांच्या पुतळ्याचे काम ज्याने केले त्या आपटेला अद्याप अटक का केली नाही? तो कुठे पळून गेला? देवेंद्र फडणवीस यांनी अजून माफी का मागितली नाही? असे प्रश्नही नाना पटोले यांनी विचारले.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




