“मुख्यमंत्र्यांचं ते विधान धक्कादायक”; शरद पवारांचा महायुतीवर निशाणा

मुंबई : राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे राज्याचे वातावरण तापले आहे. अवघ्या 8 महिन्यांपूर्वी या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केले होते. नौदलाकडून उभारण्यात आलेला हा पुतळा समुद्रकिनारी असलेल्या वाऱ्यामुळे पडला असे स्पष्टीकरण देण्यात आले. यावरुन शिवप्रेमींनी रोष व्यक्त केला होता. या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने मुंबईमध्ये जोडे मारो आंदोलन केले. हुतात्मा पुतळ्यापासून गेट वे ऑफ इंडिया पर्यंत महाविकास आघाडीचे सर्व नेत्यांनी आंदोलन केले. यावेळी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. यावर जेष्ठ नेते शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळून महाराजांचा अपमान केल्याप्रकरणी महाविकास आघाडीने हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया पर्यंत मोर्चा काढत सरकारला जोडे मारो आंदोलन केले. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खा. छत्रपती शाहू महाराज, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. हुतात्म्यांना अभिवादन करून हा मार्चा गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत पोहचला, यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, मालवणच्या राजकोट किल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्यामुळे पडला असे विधान मुख्यमंत्र्यांनी केले. गेट वे ऑफ इंडियासमोरचा पुतळा अनेक वर्षापासून आहे, राज्यातही अनेक भागात असे पुतळे आजही भक्कमपणे उभे आहेत. राजकोटच्या किल्यावरील पुतळा कोसळण्याची घटना हा भ्रष्टाचाराचा नमुना आहे. महाराजांचा पुतळा कोसळल्याने देशातील शिवप्रेमींचा अपमान झाला आहे, ज्यांच्यामुळे हा पुतळा पडला त्यांचा निषेध करण्यासाठी आजचे आंदोलन होते. असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




