बदलापूर प्रकरणात सत्ताधारी आमदाराचं संतापजनक वक्तव्य, म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी काय…

बुलढाणा : बदलापूरच्या शाळेत झालेल्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. बदलापूरच्या नागरिकांनी थेट रेल रोको करत आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यांसाठी आंदोलन केले. त्यादिवशी संपूर्ण बदलापूर रस्त्यावर उतरलं होते.त्या दिवसापासून राज्यात दररोज महिला आणि बाल अत्याचाराच्या घटना उघडकीस येत आहेत. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. पण उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महाविकास आघाडीनं बंद मागे घेत ठिक-ठिकाणी तोंडाला काळे मास्क आणि काळ्या फिती बांधून आंदोलन केलं. राज्यभरातून अशा घटना सातत्याने समोर येत असतानाच शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या विधानाने एकच खळबळ उडाली आहे. अशा प्रकारच्या घटना घडत असतात, मग आता काय मुख्यमंत्री राज्यातील शाळांमध्ये जाऊन पहारा देतील का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
नेमकं काय म्हणाले संजय गायकवाड?
“बदलापूरची घटना दुर्दैवी आहे. हा गुन्हा करणारी एक विकृती आहे. पण विरोधक या घटनेवरून राजकारण करत आहेत. विरोधातले सगळे पक्ष या मुद्द्यावरून थयथयाट करत आहेत. या घटनेला सरकारला जबाबदार धरत आहेत. पण आता काय मुख्यमंत्री राज्यातल्या सगळ्या शाळांमध्ये जाऊन पहारा देणार आहेत का? की पोलीस अधिक्षक त्यांच्या घरी जाऊन बसणार आहेत? आरोपी गुन्हा करण्यापूर्वी पोलिसांना फोन करून सांगतो का?” अशी प्रतिक्रिया संजय गायकवाड यांनी दिली आहे.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




