महाराष्ट्र बंदबाबत सर्वात मोठी अपडेट! हायकोर्टाचा महाविकास आघाडीला झटका

मुंबई : राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी विरोधी पक्षांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. दरम्यान, वकील गुणरत्न सदावर्तेंसह इतरांनी बंदविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याबाबत तातडीची सुनावणी पार पडली. “कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही. जर कोणी तसा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी”, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?‘
उद्याचा बंद विकृतीविरुद्ध होता. उच्च न्यायालयाने तत्परतेने या बंदला मनाई केली. एका गोष्टीचं बर वाटलं, न्यायालय इतक्या तत्परतेने हालू शकतं हे कौतुकास्पद आहे. ज्या तत्परतेने हा निर्णय दिला, तशीच तत्परता गुन्हे आणि गुन्ह्यातील आरोपींबाबत दाखवून त्यांना शिक्षा देण्याची तत्परता दाखवावी’, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
‘उच्च न्यायालयाचा निर्णय मान्य नाही, पण कोर्टाचा आदर ठेवावा लागतो. या बंदच कारण वेगळं होतं. सुप्रीम कोर्टात जायची ही वेळ नाही. जनतेचा संताप उफाळला तर आणखी कठीण होईल. उद्याचा बंद आम्ही मागे घेत आहोत, पण राज्यभर प्रत्येक चौकात महाविकासआघाडीचे नेते आणि कार्यकर्ते तोंडाला काळी फिती आणि काळे झेंडे घेऊन निषेध करतील’, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.
शरद पवारांचं आवाहन
उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता शरद पवार यांनी उद्याचा बंद मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. शरद पवार यांनी २४ ऑगस्ट रोजी होणारा राज्यव्यापी बंद मागे घ्यावा असं म्हटलं असून संविधानाचा आदर राखत हे आवाहन करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
नाना पटोले काय म्हणाले?
उद्या काळा झेंडा आणि काळी पट्टी बांधून दुपारी 11 ते 12 वाजेपर्यंत आम्ही महाराष्ट्रामध्ये सरकारच्या मुस्कटदाबी सरकारच्या धोरणाविरोधात शांततेत बसणार आहोत. आम्हाला कोर्टाने दिलेला निर्णय मान्य असून त्याचा आम्ही आदर करू. सामान्य नागरिक म्हणून आमचे सर्व नेते वेगवेगळ्या भागांमध्ये एक तासांचे आंदोलन करणार आहे. आम्ही कोर्टाचा आदर करून वाटचाल करत आहोत. आम्ही बंद करणार नाही पण लोक स्वयंपूर्तीने बंद करतील तर त्याला आमचा इलाज नाही, असं नाना पटोले म्हणाले.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




