बाळासाहेब थोरातांचा महायुती सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, मंत्रालय टक्केवारी कमावण्याचे…

नंदूरबार – महायुती सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. कर्नाटकतील भाजपा सरकार ४० टक्के कमीशनवाले होते महायुती सरकार तर त्यापुढे गेले आहे, भ्रष्टाचाराचे नवनवे विक्रमच या सरकारने रचले आहेत. महाराष्ट्राच्या डोक्यावर कर्ज लादून महागाई वाढवली आहे, महाराष्ट्र हे सर्वात महागडे राज्य अशी ओळख निर्माण झाली आहे. महायुती सरकार गुजरातधार्जिणे असून गुजरातमधून मोठ्या प्रमाणात ड्रग आणायचे व राज्यातले उद्योग गुजरातला पाठवायचे काम मागील दोन वर्षांपासून सुरु आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दिल्लीसमोर व गुजरात लॉबीसमोर झुकणारे भाजपा युती सरकार उखडून फेका, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
उत्तर महाराष्ट्र विभागातील नंदरूबार, धुळे, जळगाव जिल्ह्यातील आढावा बैठक नंदूरबारमध्ये पार पडली या बैठकीला काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, प्रदेश कार्यध्यक्ष आमदार कुणाल पाटील, यांच्यासह काँग्रेस नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आढावा बैठकीत बोलताना विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, महायुती सरकारचा पायाच भ्रष्ट आहे, ५० खोके एकदम ओके, हे आजही लोक विसरले नाहीत. मंत्रालय हे आता टक्केवारीचे केंद्र झाले आहे, फक्त पैसे कमावण्याचे काम सुरु आहे. अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे, चार चार महिने पगार होत नाहीत आणि लाडकी बहिण योजनेच्या प्रचारावर सरकार ४०० कोटी रुपयांची उधळपट्टी करत आहे. भ्रष्ट महायुती सरकारपासून महाराष्ट्र वाचवायचा आहे हे लक्षात ठेवून विधानसभेला काम करा व महाविकास आघाडीचे सरकार आणा, असे आवाहन थोरात यांनी केले.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




