आशिष शेलारांच्या टीकेनंतर जरांगे पाटलांचा इशारा, म्हणाले…

छत्रपती संभाजीनगर – मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे सातत्याने भाजपा तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. त्यांच्या टीकेला भाजपाकडून सातत्यानं उत्तर दिलं जात असलं तरी त्या उत्तरालासुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याकडून प्रतिउत्तर दिलं जात आहे. आता मुंबई भाजपा अध्यक्ष, आमदार आशिष शेलार यांनी टोकाची भूमिका घेत जरांगे पाटील यांना थेट शब्दात धमकावलं आहे. यावरुन जरांगे यांनी शेलार यांना इशारा दिला आहे.
आशिष शेलारांनी केलेल्या टीकेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना इशारा देत मराठ्यांना चॅलेंज करू नका, असं वक्तव्य केले आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलत असताना राजकीय भूमिका घेऊन बोलला तर सडेतोड उत्तर देऊ अशी टीका आशिष शेलार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केली होती.
मराठ्यांना चॅलेंज करू नये – जरांगे
मागच्या दारातून गेलेल्यांना आम्ही मराठे समजत नाही. मैदानात असणाऱ्यांना मराठे म्हणून मोजतो, असे मनोज जरांगे यांनी म्हटले. ते म्हणाले की, राजकारणाचे गणित वेळेवर केले जाते. राजकारणात काही गणित सांगयला नको. तो नियम मी पाळतो. बच्चू कडू म्हणतात ते खरे आहे. ते शेतकऱ्यांची भूमिका मांडणारे आहेत. हे आशिष शेलार यांनी समजून घ्यायला पाहिजे. त्यांनी बच्चू कडू यांना प्रत्युत्तर देण्याच्या भानगडीत पडू नये. मराठ्यांना चॅलेंज करू नये. मी बोलत नाही म्हणून तुम्ही बोलायला लागले, असे समजू नका. भाजपच्या लोकांचे डोके काम करत नाही. आम्ही त्यांना भाव देत नाही. शेवटी मराठापुढे शांत बसले नाही तर तुमचं राजकीय करीअर मराठा संपवून टाकेल. असा इशारा जरांगे यांनी दिला.
शेलार काय म्हणाले होते?
मराठा आरक्षणाबद्दल आम्ही सकारात्मक असून समर्थनार्थ अशी योग्य भूमिका घेत आहोत. पण ज्यावेळी तुम्ही आरक्षणाच्या मुद्द्याअडून राजकीय भूमिका घेऊ लागाल, त्यावेळी सडेतोड उत्तर देऊ मागे-पुढे पाहणार नाही, असं आशिष शेलार यांनी थेट मनोज जरांगे पाटील यांना सुनावलं होतं.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




