सरकारची चिंता वाढली ! मनोज जरांगे यांचं पुन्हा उपोषण सुरु

जालना : मनोज जरांगे पाटील यांचे आजपासून पुन्हा उपोषण सुरु झाले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत आजपासून आमरण उपोषण सुरु केले आहे. सगसोयरेसह सरसकट मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हे उपोषण करण्यात येत आहे. सरकारने आरक्षणाबाबत ठोस भूमिका न घेतल्याने जरांगे पाटील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
जरांगे पाटील म्हणाले की, सरकारने मराठ्यांना धोका दिल्याने पुन्हा एकदा उपोषणाची वेळ आली आहे. समाजासाठी मी आमरण उपोषण करत आहे. समाजाचे फक्त मी एवढंच ऐकत नाही. समाज मला आमरण उपोषण करू नका, असे म्हणत होता. सगेसोयरेची अंमलबजावणी करा, गुन्हे मागे घ्या, तीनही गॅझेट लागू करा. आरक्षण द्यायचे असेल तर बहाण्याची सरकारला गरज नाही. मराठा समाजाच्या मुलांना नोकरभरती, ऍडमिशनमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. Ews सुरू ठेवावे. Ecbc आणि कुणबी हे तीनही प्रमाणपत्र सुरू ठेवावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
मराठा आणि कुणबी एकच
आम्हाला सरकारला जेवढा वेळ द्यायचा होता तेवढा वेळ आम्ही दिला आहे. आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करा. आरक्षणाबाबत आम्ही ठाम आहोत. सगेसोयरेची अंमलबजावणी करा. कुणाच्या हरकती असतील तर आम्हाला त्याच्याशी देणे घेणे नाही. मराठा आणि कुणबी एकच आहेत. 2004 चा कायदा सुशीलकुमार शिंदे सरकारने बनवला आहे. तुम्ही त्या कायद्यात दुरुस्ती करा किंवा दुसरा कायदा बनवला तरी मला हरकत नाही, असेही जरांगे यांनी म्हटले आहे.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




