दोन दिवसांत पुण्यात पैशाचा पाऊस पडेल; रवींद्र धंगेकर यांचा आरोप…

पुणे : पुणेकरांनी भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी निवडून देऊनही पुण्याच्या विकासाला खिळ का बसली ? असा सवाल काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजप नेत्यांना केला. तसेच या प्रश्नाचे उत्तर पुणेकर मतदानाच्या माध्यमातून देतील आणि मला विजयी करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची असून, पुढील दोन दिवसांत पुण्यात पैशाचा पाऊस पडेल. यावर प्रशासनाने योग्य ते प्रतिबंधात्मक उपाय करावेत, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशाराही धंगेकर यांनी दिला.
पुणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी, इंडिया फ्रंटचे काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचाराच्या सांगता समारंभाप्रसंगी काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, नागपूरचे आमदार विकास ठाकरे, निवडणूकप्रमुख मोहन जोशी, माजी आमदार उल्हासदादा पवार, दीप्ती चवधरी, पूजा आनंद, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, राज्य प्रवक्ता गोपाळ तिवारी, अमीर शेख, माध्यम समन्वयक राज अंबिके, आदींसह महाविकास आघाडी व इंडिया फ्रंटचे पदाधिकारी उपस्थित होते.
धंगेकर म्हणाले, निवडणुकीच्या प्रचारासाठी काढलेल्या पदयात्रा, मेळावा, सभांना पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघ मी पिंजून काढला आहे. गेल्या दहा वर्षांत पुण्याच्या विकासाला खिळ का बसली, हे पुणेकर या निवडणुकीच्या माध्यमातून भाजपला विचारतील आणि महाविकास आघाडीला विजयी करतील.




