मोठी बातमी! पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची निवडणूक आयोगाकडून बदली

मुंबई – राज्यात विधानसभा निवडणूक होत असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन टॅप केल्याचे रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप आहेत. विरोधकांकडून वारंवार रश्मी शुक्ला यांच्या बदलीची मागणी केली जात होती. असं असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांची बदली केली आहे.
कशी असेल नव्या नियुक्तीची प्रक्रिया?
रश्मी शुक्लांच्या बदली आदेशांनंतर आता नव्या पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मुख्य सचिवांच्या आदेशांनुसार, तीन वरीष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचं पॅनल गठित करून त्यांच्याकडे नव्या नावाबाबतचा अहवाल तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे पॅनल आपला अहवाल राज्य सरकारला सादर करेल. त्यानंतर हा अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाला दिला जाणार असून त्यानंतर नव्या पोलीस महासंचालकांच्या नावाची घोषणा केली जाईल. आज संध्याकाळपर्यंत ही घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांची धामधूम चालू असताना दुसरीकडे रश्मी शुक्ला यांच्या बदलीच्या आदेशांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून रश्मी शुक्लांना व त्यांच्या अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं जात होतं.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




