मराठ्यांना देश चालवायचाय, आरक्षण कसले मागता? संभाजी भिडेंनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका केली स्पष्ट

सांगली : सध्या राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीमधून संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे. तसेच निवडणूकीच्या आधी आरक्षण दिले नाही तर निवडणूका लढू असा इशारा देखील जरांगे पाटील यांनी दिला आहे. तर ओबीसी समाजाचा यासाठी विरोध आहे. यावर आता श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
यावेळी मराठा आरक्षणासंदर्भातही त्यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर संभाजी भिडे म्हणाले की, मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे. याचे उदाहरण देताना त्यांनी सांगलीतील कमांडो ट्रेनिंग कॅम्पचा उल्लेख केला. या ट्रेनिंग कॅम्पमध्ये निःशुल्क प्रवेश दिला तर वाघ आणि सिंहानी तिथे प्रवेश घ्यावा का? विमान उडविण्याच्या प्रशिक्षणासाठी गरुडाने प्रवेश घ्यावा का? स्विमिंग क्लबमध्ये मासळी प्रवेश घेईल का? अशाच पद्धतीने मराठ्यांनी आरक्षण मागावे का? हा प्रश्न संभाजी भिडे यांनी उपस्थित केला.
“मराठ्यांना उभा देश चालवायचा आहे. आरक्षण कुठे मागता? सिंहानी जंगल सांभाळायचे असते. मराठा जात ही संबंध देशाचा संसार चालविणारी जात आहे, हे मराठ्यांच्या ज्या दिवशी लक्षात येईल, त्यादिवशी या मातृभूमीचे भाग्य उजळून जाईल. हे त्यांच्या लक्षात येत नाही, हे आपले दुर्दैव आहे”, असेही संभाजी भिडे यांनी सांगितले.
२५ ऑगस्ट रोजी सांगलीत कडकडीत बंद
बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर २५ ऑगस्ट रोजी संबंध सांगली जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात येणार असल्याची घोषणा संभाजी भिडे यांनी केली. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे हा बंद पुकारण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच बांगलादेशमध्ये जो अत्याचार सुरू आहे, त्याविरोधात भारत सरकारने कडक पाऊले उचलावीत, अशीही मागणी त्यांनी केली.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




