मतदार यादीत गोंधळाची परंपरा कायम…

पुणे (संपादक अकबर शिकीलगार) :- गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये मतदारयादीत असलेली गोंधळाची स्थिती या वेळीही कायम राहिली. शहरातील अनेक भागांत मतदारयादीतून अनेकांची नावे गायब झाली आहेत.
तर, काही ठिकाणी मतदारांची नावे मृतांच्या यादीत आहेत. त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे.या निवडणुकीत बोगस मतदान झाल्याच्या अनेक तक्रारी शहराच्या वेगवेगळ्या भागांतून आल्या. या स्थितीचा फटका काॅंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनाही बसला. त्यांच्या नावे बोगस मतदान करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. अनेक नव मतदारांच्या नावावर ते मतदान केंद्रात जाण्याआधीच मतदान झाल्याचे दिसून आले. दऱम्यान, अशा मतदारांकडून विशिष्ट अर्ज भरून घेण्यात आला असून, त्यांचे मत नोंदवून घेण्यात आले आहे.या निवडणुकीत प्रामुख्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांची नावे मतदार यादीतून गायब झाल्याचे दिसून आले. नेहमीच्या मतदार केंद्रावर पोहचलेल्या नागरिकांना नावच नसल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागला. तर कोथरूड, पर्वती, कसबा, आणि कॅन्टोन्मेंट भागांतील दाट लोकवस्ती परिसरातील लोकांची नावेच मतदार यादीत नव्हती. राजकीय पक्षांच्या बुथवरही या नागरिकांना कोणीही उत्तरे देत नसल्याने नागरिकांचा संताप आणखी वाढल्याचे दिसून आले.
नियमांचा अतिरेक; ज्येष्ठांना फटकामतदान केंद्राच्या १०० मीटर परिसराबाहेर नागरिकांना वाहने लावून मतदान केंद्रावर जाणे बंधनकारक होते. तसेच आत मोबाइल नेण्यासही मनाई होती. मात्र, अनेक मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागारिकांना या नियमांचा फटका बसला. उन्हामुळे गाडीत असलेल्या ज्येष्ठांंना केंद्रापर्यंत सोडण्याची विनंती नागरिक करत होते.




