शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिल्या चार चिठ्ठ्या..!

आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आई,वडील, मित्र, होणारी पत्नी यांना लिहिलेल्या चिठ्य्या समोर आल्या आहेत. यातून त्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचे दिसून येत आहे.

पिंपरी : श्री संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज शिरीष महाराज मोरे (वय ३०) यांनी गुरुवारी सकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आई,वडील, मित्र, होणारी पत्नी यांना लिहिलेल्या चिठ्य्या समोर आल्या आहेत. यातून त्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचे दिसून येत आहे.

पहिली चिठ्ठी मित्रांसाठी

‘प्रिय आकाश, मनिष, अक्षय, अजय आणि सर्व मित्रांनो,मी युद्धाच्या मैदानातून पळून जातोय, हे मला ठाऊक आहे, पण तुमच्याकडे हात जोडून विनंती करतो – माझ्या आई-वडिलांची काळजी घ्या. माझ्या बहिणीला चांगले स्थळ पाहा आणि तिचे लग्न लावा. माझ्या डोक्यावर प्रचंड कर्ज आहे – मुंबई सिंगवी १७ लाख, बचत गट ४ लाख, सोने तारण २.२५ लाख, गाडी ७ लाख आणि किरकोळ ८० हजार रुपये. गाडी विकून काही फिटेल, पण उरलेलं कर्ज तुम्ही मिळून काहीतरी करून फेडा. मला ठाऊक आहे, मी हे सहज करू शकलो असतो, पण आता लढण्याची ताकद नाही. मला माफ करा’

Advertisement

दुसरी चिट्टी कुटुंबासाठी

‘प्रिय बाळा आणि संपूर्ण कुटुंब, तुम्ही लढत राहा, हार मानू नका. आयुष्य थांबवू नका. मी संपलोय, पण तुम्ही अजून खूप मोठं होणार आहात. मी हतबल झालोय, म्हणून पूर्णविराम देतोय. स्वतःची काळजी घ्या आणि आयुष्याला पुढे न्या.’

तिसरी चिठ्ठी होणाऱ्या पत्नीसाठी

शिरीष महाराज मोरे यांचा विवाह नुकताच ठरला होता. टिळाही झाला होता. २० एप्रिल रोजी त्यांचा विवाह होता. त्यांनी होणाऱ्या पत्नीसाठी चिठ्ठी लिहिली आहे. ‘आपली कहाणी आता कुठे फुलायला सुरुवात झाली होती आणि मी तुला असं सोडून चाललोय. माझ्या वाईट काळात तू माझ्यासोबत होतीस, माझ्या प्रत्येक निर्णयात माझ्या सोबत उभी राहिलीस. पण मी तुला न्याय देऊ शकलो नाही. मी तुझी स्वप्नं तोडतोय, याची मला जाणीव आहे. तुला एका चांगल्या मुलासोबत सुखी पाहायचं होतं, पण मी तुला फक्त दुःख दिलं. कृपा करून पुढे जा, आयुष्य सुंदर कर. खूप मोठी हो’.

चौथी चिठ्ठी आई-वडिलांसाठी

‘प्रिय मम्मी-पप्पा, दीदी, वयाच्या ३० व्या वर्षी जे काही मिळवायचे होते ते तुमच्या पाठिंब्यामुळे सहज मिळाले. तुम्ही माझ्यासाठी खूप काही केले, पण मीच आता सोडून चाललोय. कधी कधी सर्व मिळवूनही माणूस हरतोच. मी हरलो… मी थांबतोय. याचा संपूर्ण दोष माझा आहे. तुम्हाला एकटं टाकून जातोय. मला माफ करा… तुमचाच पप्प्या’.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page