लाडकी बहीण योजनेच्या मुदतीची अट काढून टाका; पृथ्वीराज चव्हाणांची मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी

सातारा : शासनाची मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा सर्व्हर वारंवार बंद असल्याने योजनेमध्ये नोंदणीला विलंब होत आहे. काही ठिकाणी नोंदणीच होत नसल्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत. ६-६ तास ओटीपी येत नाही, त्यामूळे लाभार्थींना दिवस-दिवसभर आधार केंद्रात ताटकळत बसावे लागते. अंतिम तारखेपर्यंत नाव नोंदणी होऊ शकणार नाही ही चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे या योजनेच्या मुदतीची अट काढून टाकावी, जेणेकरून राज्यातील सर्व पात्र महिलांना योजनेचा लाभ घेता येईल अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
राज्याच्या पावसाळी अधिवेशनात शासनाने या योजनेची घोषणा केली तेव्हा या योजनेची मुदत १५ जुलै ही होती, याबाबत चव्हाण यांनी अधिवेशनात योजना नोंदणीची अंतिम तारीख काढून टाकावी अशी मागणी केली होती. तसेच या योजनेचा लाभ राज्यातील ६० वर्षावरील ज्येष्ठ महिलांना सुद्धा मिळावा यासाठी वयोमर्यादेची सुद्धा अट काढली जावी, अशी सुद्धा मागणी केली होती. त्यानुसार राज्य सरकारने ३१ ऑगस्टपर्यंत मुदत वाढवली, तसेच कमाल वयोमार्यादा ६० वर्षे ची ६५ वर्षे केली.
परंतु अजूनही लाडकी बहीण योजनेत सहभागी होण्यासाठी महिला वर्गाच्या मोठ्या रांगा आहेत. सॉफ्टवेअरचा वाढता तांत्रिक बिघाड पाहता ३१ ऑगस्ट ही लाडकी बहिण योजनेची मुदत काढून ही योजना ‘सामाजिक सुरक्षा हक्क’ या स्वरुपाची करुन राज्यातील सर्व पात्र बहिणींना कधीही लाभ मिळवता येईल, असा बदल करण्याबाबतची आग्रही मागणी माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




